Wednesday 7 October 2015

मार्गदर्शन

प्रदर्शित झालेला नवा चित्रपट पूर्वी छोटय़ा गावांत उशिराने लागायचा. त्यामुळे पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्यासाठी तिकीट खिडकीवर रांगा लागायच्या. नव्या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता ताणलेली असायची. पहिल्या दिवशी पहिला शो पाहणारा चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्रॉंगच्या थाटात गावभर मिरवत असे. पण आजकाल नव्या तंत्रज्ञानामुळे नवा चित्रपट गावोगाव गल्लीबोळांतल्या टॉकिजमध्ये एकाच वेळी लागतो. त्यामुळे फारशा रांगा लागत नाहीत. उलट, मोठय़ा टॉकिजचं अस्तित्व धोक्यात आलंय. अनेक ठिकाणी नवाकोरा चित्रपट सहज उपलब्ध असल्यामुळे प्रेक्षकांची सोय झालीय. नाटकाच्या बाबतीत मात्र अजूनही दुष्काळ आहे. नव्हे, तो अधिकच वाढलाय. चांगल्या नाटकांचे मुंबई-पुण्याबाहेरचे प्रयोग दुर्मीळ होत चालले आहेत. अशा परिस्थितीत कधीतरी एखाद्या चांगल्या व्यावसायिक नाटकाची जाहिरात झळकते. विनाविलंब आपण तिकीट बुक करतो. प्रयोगाच्या दिवशी उत्सुकतेने नाटकाला जातो. नाटय़गृहातील हवंहवंसं वातावरण प्रसन्न वाटतं. तो मंद हलणारा लाल पडदा. हातात तिकीट नाचवत स्वत:ची सीट शोधणाऱ्यांची लगबग. पडद्यामागे उजवीकडून डावीकडे व डावीकडून उजवीकडे वाजणारा घंटेचा आवाज. बंद पडद्यातून कमावलेल्या आवाजात अनाऊन्समेंट होते. थोडय़ाशा मिश्कील शब्दांत मोबाइल सायलेंट करण्याविषयी सांगितलं जातं. नाटक सुरू व्हायची वेळ आलेली. मधेच उशिराने आलेलं एक जोडपं जागा शोधून चटकन् बसण्याऐवजी ‘हाय-हॅलो’मध्ये मश्गूल असतं. तिसरी घंटा होते आणि अधीर पडदा प्रसन्न संगीताच्या साथीनं बाजूला सरकत जातो. प्रेक्षकांतले दिवे मंद होतात. रंगमंच उजळतो. नाटक सुरू होतं. वेगळ्या विषयावरचं दोन-पात्री नाटक. संपूर्ण नाटक एका महानगरीय लोकलच्या डब्यात घडतं. त्यामुळे ‘मुक्काम, पोस्ट : दिवाणखान्या’त अडकलेलं मराठी नाटक पार लोकलच्या डब्यात आलेलं. नायक-नायिकेची भूमिका करणारे कसलेले व्यावसायिक कलाकार होते. नाटय़ रंगत गेलं. प्रयोग अप्रतिम झाला. पडदा पूर्ववत बंद झाला. प्रेक्षकांतले दिवे उजळले. प्रेक्षक स्वत:च्या कथानकात परतले. आम्ही काहीजण कलावंतांना भेटण्यासाठी स्टेजच्या मागे गेलो. नाटकातील कलावंत आणि दिग्दर्शक मोठय़ा विनम्रतेने सगळ्यांना भेटत होते. खरं तर अजून कलावंतांनी मेकअपही उतरवला नव्हता. बऱ्यापैकी परिचय असल्यामुळे आम्ही दिग्दर्शकाशी बोलत होतो. तेवढय़ात ‘सर आले, सर आले’ अशी कुजबुज झाली. एक ज्येष्ठ प्राध्यापक त्यांच्या शिष्यांसह येऊन दाखल झाले. तेवढय़ा गडबडीत त्यांच्या एका उपस्थित शिष्याने त्या ज्येष्ठ प्राध्यापकाला चरणस्पर्श केला. एका शिष्याने ज्येष्ठ प्राध्यापकाची कलावंतांशी ओळख करून दिली. दिग्दर्शकाने आदराने विचारलं, ‘सर, कसं वाटलं नाटक?’ झालं! या ज्येष्ठ प्राध्यापकाने अदृश्य माइक हातात घेतला आणि बोलणं सुरू झालं. प्रयोग आवडलेले अनेक प्रेक्षक कलावंतांना भेटायला आलेले होते. दोन्ही कलावंतांनी उत्तम अभिनय तर केला होताच; शिवाय मालिकांमुळे घराघरात पोचलेले हे दोघे कलावंत असल्यामुळेही प्रेक्षकांना उत्सुकता होती. काही तरुण मुलामुलींना त्या दोघांची स्वाक्षरी घ्यायची होती. काहींना त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता. पण ज्येष्ठ प्राध्यापकाचं बोलणं काही संपेचना. ते ग्रीनरूमचा ताबा घेतल्यासारखं हातवारे करीत बोलत होते. सोबतच्या शिष्यांच्या चेहऱ्यावर कौतुक दिसत होते. बोलताना अभिप्रायाचं रूपांतर मार्गदर्शनात झालेलं होतं. दिग्दर्शक बिचारे ‘हो, हो’ करीत होते. ज्येष्ठ प्राध्यापकांच्या सूचनांत काही दम नव्हता; पण सूचना काही थांबेनात. ‘दुसऱ्या अंकाला स्पीड हवा होता’, ‘पात्रांनी सायको-टेक्निकचा वापर करायला पाहिजे होता’, ‘पात्रांची इन्व्हॉल्व्हमेंट काही जागी कमी पडतेय’ अशी शेरेबाजी सुरूच होती. दिग्दर्शक, कलावंत अस्वस्थ झाल्याचं स्पष्ट जाणवत होतं. तरीही ज्येष्ठ प्राध्यापकांचं थिअरॉटिकल बोलणं काही थांबेचना. शेवटी ‘पहिल्या अंकाला ट्रीटमेंट वेगळी हवी होती..’ हे ज्येष्ठ प्राध्यापकांचं वाक्य थांबवत दिग्दर्शक बोलले, ‘सर, असं व्हेग बोलू नका. ट्रीटमेंट वेगळी म्हणजे नेमकी कशी हवी होती, ते सांगा.’ ज्येष्ठ प्राध्यापक चपापले. त्यांना काय म्हणायचं होतं ते नेमकेपणाने सांगता येईना. त्यामुळे या लक्षवेधी मार्गदर्शनाची निर्थकता सगळ्यांच्याच लक्षात आली. पण तसं बोललं कुणी नाही.
एक चांगला प्रयोग नुकताच पाहिलाय, प्रयोगाचा अनुभव आत जिरतोय- म्हणजे चांगल्या प्रयोगानंतर येणारं भारावलेपण अजून आहे.. अशा अवस्थेत रंगकर्मीना भेटून त्यांना दाद देणं, अभिनंदन करणं हा रसिकतेचा एक चांगला रिवाज आहे. बारशाला गेल्यानंतर लेकराला ‘नकटं’ म्हणायचं नसतं. उलट, ‘गोबऱ्या गालात नाक लपलंय,’ असं म्हणायचं असतं. तसं प्रयोगानंतर भेटताना दाद देणं, कौतुक करणं अपेक्षित असतं. इथं तर प्रयोगालाही नाव ठेवायला जागा नव्हती. दिग्दर्शक, कलावंतांचा चांगला दबदबा होता. तरीही नम्रतापूर्वक ते ज्येष्ठ प्राध्यापकांचं ऐकून घेत होते. एखादा ऐकून घेतोय म्हणून किती ऐकवावं? शेवटी या मार्गदर्शनात नाटकाच्या व्याख्याच सांगायच्या बाकी होत्या. मुळात नाटक हा प्रत्यक्ष रंगमंचावर मनापासून खेळायचा खेळ आहे. क्रिकेटच्या सामन्याचं रसभरीत धावतं वर्णन करणारा समालोचक खेळाडूला मार्गदर्शन करू लागला तर अवघड परिस्थिती निर्माण होईल. पण आपल्याकडे सर्व क्षेत्रांत मोफत आणि सहज उपलब्ध असलेली गोष्ट म्हणजे मार्गदर्शन! रात्री कंपाऊंडच्या गेटला कडीकुलूप लावून घरात गुडुपचूप झोपणारे सीमेवरच्या सैनिकांना राष्ट्रभक्तीपर मार्गदर्शन करायला तयार असतात.
अनेक कलावंतांनी कुठलंही प्रशिक्षण न घेता स्वत:ला प्रयोगात सिद्ध केलेलं आहे. अशांना पुस्तकी मार्गदर्शनाची गरज नसते. सगळे सिद्धान्त त्यांनी स्वत:च्या पद्धतीने समजून घेतलेले असतात. जो प्रत्यक्षात सिद्ध करतो, त्याला पुन्हा सिद्धान्त सांगण्याचे प्रयत्न मार्गदर्शकांच्या हट्टापायी होत असावेत. आधीपासूनच आपल्याकडे मार्गदर्शकाबद्दल (गुरूबद्दल) आदराची भावना आहे. या आदरापोटी पटलं नाही तरी ऐकून घेतात. हा आयता आदर मिळवण्यासाठी कुणीही कोणत्याही विषयावर मार्गदर्शन करायला एका पायावर तयार असतो.
कोणी कुणाला मार्गदर्शन करावं, याचे काही संकेत आहेत. तसंच केव्हा, कुठं आणि कधी मार्गदर्शन करावं, याचेही काही नियम असायला हवेत. आपल्याकडे वकूब नसलेला माणूस अधिकारवाणीने मार्गदर्शन करीत असतो. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे सराईतपणे गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला शेजारच्या सीटवर बसलेला बिनधास्त मार्गदर्शन करीत असतो. बऱ्याचदा शेजारी बसणाऱ्याला स्वत:ला गाडी चालवता येत नसते, पण व्यवस्थित मार्गदर्शन मात्र सुरू असतं. क्रिकेटची मॅच पाहत असतानाच्या कॉमेन्ट्स भावनिक असल्या तरी मार्गदर्शकही असतात. ‘तेंडल्यानं हा रन घ्यायला नको होता’, ‘धोनीनं जडेजाला शेवटची ओव्हर देऊन माती खाल्ली’, ‘टॉस जिंकल्यावर बॅटिंग घ्यायला हवी होती’ असे फुकटचे सल्ले अधिकारवाणीने दिले जातात. सल्ला देताना आपल्याला मैदानाचा अनुभव असायला हवा असं आवश्यक नसतं. सल्ला देणाऱ्यांनी एकदा मॅचची पहिली ओव्हर खेळून बघावीच. नवा चकाकणारा लालबुंद चेंडू ‘सुईई’ करीत कानाजवळून जातो ना तेव्हा कळू शकतं- चौका-छक्का मारणं म्हणजे काय असतं? प्रेक्षक म्हणून आपल्याला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार नक्कीच आहे. म्हणून मार्गदर्शनही करणं बरोबर नसतं. कुठलाही कार्यक्रम असू द्यात, कुठलाही विषय असू द्या, ‘पाहुण्यांनी मार्गदर्शनपर दोन शब्द बोलावेत-’ असं म्हटल्याबरोबर जो कोणी बोलायला उठतो तो ज्ञानाचा उद्गाता झालेला असतो. माइकचा शोध लागल्यापासून मार्गदर्शकांच्या संख्येत वाढ झालेली असावी. पण तसं म्हणावं तर माईकशिवायही जमेल तिथं, जमेल तसं मार्गदर्शन अव्याहत सुरूच असतं. पार ऋषी-मुनींच्या मार्गदर्शनापासून ते ‘ताईचा सल्ला’, ‘विचारा तर खरं’, ‘वहिनींचा सल्ला’, ‘कार घेताना’, ‘फ्लॅट घेताना’, ‘आरोग्याचा सल्ला’, इ. इ. ते सेल्फी मार्गदर्शन वर्गापर्यंत घनघोर मार्गदर्शन सुरू असतं. लोकही मोठय़ा आत्मीयतेने प्रश्न विचारत असतात. ‘माझे वय पंचेचाळीस वर्षे आहे. मला ऑफिसात रोज आठ तास बैठे काम करावे लागते. शरीर जास्तच स्थूल झालेले आहे. चालताना त्रास होतोय. काय करावे?’ अशा अनेक त्रस्त प्रश्नांना मन:पूर्वक, सविस्तर मार्गदर्शन होताना आपण पाहतो; वाचतो.
एका अंत्यविधीसाठी स्मशानात गेलो होतो. तिथे काही समाध्या बांधलेल्या दिसल्या. एक चकचकीत टाइल्स लावून सजवलेली समाधी होती. उत्सुकतेने जवळ जाऊन पाहिलं तर कोनशिलेसारखा मजकूर वाचनीय होता- ‘आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक’ म्हणून समाधीत निवांत झोपलेल्या गृहस्थाचं नाव होतं. त्या नावापुढे ‘माजी जिल्हा परिषद सदस्य (अपक्ष)’ असा मजकूर होता. चिरनिद्रा घेणारं मार्गदर्शन परवडलं. एका दरवाजावर चक्क लटकणारं मार्गदर्शनही पाहण्यात आलं. एका प्राध्यापक महोदयांनी घरावर भलीमोठी नेमप्लेट लावलेली होती. त्यांना मिळालेल्या पदव्या, शेवटी ‘पीएच. डी. गाइड’ असा भरगच्च मजकूर नेमप्लेटमधून उतू जात होता.
मार्गदर्शनाच्या सुकाळामुळे काही विद्यार्थी आता मार्गदर्शक निरखून-पारखून घेताहेत. ‘आम्हाला असे मार्गदर्शक (प्रमुख) नकोत,’ असे ठामपणे सांगताहेत. संप करताहेत. तासिका बंद करताहेत. म्हणजे ही चर्चा मार्गदर्शनाबद्दलचीच आहे. यातलं राजकारण घडीभर बाजूला ठेवू या; पण आयुष्याच्या प्रवासात मार्गदर्शकाचं महत्त्व नाकारताच येत नाही. आपला मार्गदर्शक कर्तृत्ववान असावा, पारदर्शक असावा, ही विद्यार्थ्यांची अपेक्षा रास्तच आहे. हे शहाणपणाचं मार्गदर्शन त्यांना अनुभवातून मिळालं असावं. वेल वाढताना डावीकडे वळली तशी उजवीकडेही वळू शकते. फक्त तिचा प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास अखंडित असायला हवा. हे माझे मार्गदर्शन नव्हे; एक प्रांजळ अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment